२१६ ) एक रम्य संध्याकाळ – आयुष्यातील क्षणांसोबत
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे तलावाच्या काठी फिरायला गेलो. फिरून झाल्यानंतर काठावर विसावलो . आकाशात सूर्याची परतण्याची लगबग दिसत होती . आकाशात पक्षी थव्यांनी उडत होते. क्षणात काठावर विसावत होते. मी उडणाऱ्या थव्याचे फोटो काढू लागलो . फोटो काढता काढता माझ्या मनात भूतकाळातले क्षण कधी उडू लागले हे मला कळलेच नाही. ज्यावेगाने हे लाखो क्षण नजरेसमोर उभे ठाकले हे बघून मी विस्मित झालो .
हे क्षण सर्व प्रकारचे होते. काही क्षण सुखाचे होते, काही क्षण दु:खाचे होते, काही क्षण अपमानाचे होते, काही क्षण रागाचे होते, काही क्षण आनंदाचे होते, काही क्षण पराभवाचे होते, काही क्षण बदला घेतला ह्या समाधानाचे होते, काही क्षण काळजीचे होते, काही क्षण तणावाचे होते, काही क्षण आश्चर्याचे होते, काही क्षण शांततेचे होते, काही क्षण हुरहूर लावणारे होते, काही क्षण पश्चातापाचे होते, काही क्षण वियोगाचे होते, काही क्षण विजयाचे होते, काही क्षण स्वप्न पूर्तीचे होते, काही क्षण लोभाचे होते, काही क्षण भांडणाचे होते, काही क्षण शरमेचे होते, काही क्षण वेदनेचे होते, काही क्षण प्रेमाचे होते, काही क्षण लज्जेचे होते.
हे क्षण कोणत्याही ज्या क्रमाने आले त्यांना सामोरा गेलो. त्यांचे मला विस्मरण झाले नाही ह्याच गोष्टीने माझे मन सुखावले. मी त्यांचे आभार मानले कारण ह्या प्रत्येक क्षणानी मला काहीतरी शिकवले होते. माणूस म्हणून घडविले होते. मुख्य म्हणजे माझी साथ सोडली नव्हती त्यामुळे माझे पाय जमिनीवर राहायला हे क्षण कारणीभूतही झाले .
फारतर २० मिनिटे मी विचारात गर्क असेन, एकीकडे फोटोही काढत होतो. मला अंधार जाणवू लागला आणि मी भानावर आलो . आयुष्याचा संपूर्ण भूतकाळ नजरेसमोर अवतरला होता . माझ्या स्मरणशक्तीचे मला कौतुक वाटले.
मग मी डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला . मावळतीच्या सूर्याला नमस्कार केला आणि परतलो.
सुधीर वैद्य
२५ – ०२ – २०१३
Kya baat hai