दिवसाची सुरुवात प्रसन्न प्रभातीने होते. रात्रीचा अंधार संपवून रवी प्राचीवर दिसू लागला की हळूहळू झुंजूमुंजू होत प्रकाशाच्या किरणांचे झोत धरेवर येतात. साऱ्या चराचरात चैतन्य पसरते. प्रभाती सूर्य नभी रंगती दशदिशा भूपाळी म्हणती… अशी अनेक काव्य या प्रभात समयी रचली गेली. आजही आपण मोबाइलवर सुप्रभातचे मेसेज वाचतो आणि पाठवतोही.
जसजसा दिवस चढू लागतो तसतसे दैनंदिन जीवन प्रवाही होते. कामात, व्यवसायात, शिकण्यात, अभ्यास करण्यात, नोकरी, घरकाम करण्यात दिवस भुर्रकन संपून जातो आणि मग हळूहळू सूर्यदेव घरी जायची तयारी करायला लागले की आपलाही उत्साह थोडा कमी होतो. दिवस आणि रात्र यामधला तो संध्याकाळचा काळ सुरू होतो.
संध्याकाळी काय माहीत नाही पण उगाच थोडी हुरहूर लागते. अशी एखादी संध्याकाळ जर समुद्र किनारी अनुभवलेली असेल तर हूरहूर लागते म्हणजे काय ते कळते. आपण शांतपणे समुद्र किनारी वाळूत बसलेले आहोत, लाटांची गाज मंद मंद होत असताना, तो लालबुंद गोळा जसजसा क्षितिजावरून हळूहळू दिसेनासा होतो. तेव्हा खरंच क्षणभर आपण निःशब्द होतो.
अशा संध्याकाळी खरंतर माणूस दमून भागून घरी यायचा. घरातील आजी आजोबा झोपाळ्यावर बसून मंद झोके घेत नातवंडांची वाट पाहात. मुलेबाळे शाळा संपवून, भूक भूक करीतच घरात शिरत. जे आई पुढे करेल ते एका दमात संपवून, मागच्या अंगणात खेळायला पळत. जाताना दिवे लागायच्या आत घरात ये रे… असा आजीचा लाडाचा धाक असायचा.
माहेरी आलेली लेक असेल तर वहिनीच्या पुढे मागे करीत राही. संध्याकाळी उमललेल्या जाईचे गजरे किंवा रंगबिरंगी गुलबक्षीच्या वेण्या गुंफत राही. घरातील पुरुष अंगणात फेऱ्या मारत किंवा घरात काही हवे नको ते आणून देत. अंगणात पुरेसा दंगा करून झाला की पोरं दारात असलेल्या नळावर नाही तर बादलीतील पाण्यात हातपाय धुवत. पुन्हा थोडं आईच्या पुढं मागे, आत्याशी गप्पा झाल्यावर आजीची तोपर्यंत हाक येई. माजघरातल्या पिवळ्या दिवाच्या मंदशा प्रकाशात आजी तिथेच असलेल्या देवघरात समई तेववत असे. उदबत्तीचा मंद सुवास पसरलेला असे. त्या समईचा प्रकाश बरोबर आजीच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर पडे. ती काहीशी तेजस्वी आणि समाधानकारकनी दिसे. तोपर्यंत आई दुपारी वळलेल्या बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य घेऊन येई. अगदी रोज नाही पण मधून मधून काही तरी घरात बनत असे. आत्या, बाबा, आई आणि नातवंडे साऱ्यांना बरोबर घेऊन आजी शुभंकरोती गोड आवाजात म्हणत असे. त्यानंतर रामरक्षा, भीमरूपी आणि पाढे म्हणेपर्यंत लाडूचा प्रसाद मिळत नसे. काका, मामा, आत्या जे कोण मोठे असेल ते पुनःपुन्हा 23, 29 सारखे पाढे घोटून घोटून म्हणून घेत.
आईची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होई आणि मुलांची घरचा अभ्यास करण्याची. अडलेली गणिते, काका बाबा सोडवून देत तर आत्या एखादा छानसा निबंध सांगे. स्वयंपाक घरात सर्वांची एकत्र पाने मांडली जात.गरम भाकरी किंवा पोळी बरोबर चेष्टा मस्करी, कधी एखादी चर्चा करत जेवणे होत आणि मग 9, 10 वाजेपर्यंतच अंथरूण घालून पोरं गडप होत. ते काम त्यांच्याकडे असे. सारे आवरून झाल्यावर मोठी माणसं एकत्र कधी बोलत बसत. तर कधी काही वाचन चाले. अशी संध्याकाळ रात्रीकडे सरकताना रम्य होत असे. आज मात्र चित्र बदललेले दिसते. कामाच्या वेळा इतक्या वाढल्या आहेत की सात वाजल्याशिवाय ऑफिसमधून बाहेर पडणेही होत नाही. मग त्या प्रचंड वाहनांच्या रांगेत आपले वाहान अक्षरशः दामटत घरी येईपर्यंत संध्याकाळ संपत आलेली असते. अगदी नोकरी करणाऱ्या अनेक स्त्रियांना देखील या परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यातून शिफ्ट ड्युटी असेल तर सारे वेळापत्रकच बदलत राहते. दोघांनी नोकरी करणेही आता गरजेचे झाले आहे.
त्यामुळे एकतर घरात स्वयंपाकासाठी बाई ठेवणे नाहीतर येताना बाहेरून जेवण घेऊन येणे हा पर्याय राहतो. मुलं शाळेतून परस्पर क्लास किंवा इतर काही शिकण्यासाठी जातात. त्यामुळे घरी आल्यानंतर सारेच दमलेले आणि थकलेले. आजी-आजोबा असतील तर देवघरात लाइट लावून आपले शुभंकरोती म्हणतात आणि खोलीत जाऊन सीरियल बघतात. मुले पास्ता, पिझ्झा, बर्गर, न्यूडल्स वगैरे असेल तर आवडीने खातात. सकाळी केलेली पोळी-भाजी मग नाईलाजाने आई, बाबा, आजी संपवतात.
जो तो आपापल्या मोबाइलमध्ये व्यस्त असतो. मुले कशीबशी होमवर्क संपवतात आणि मोबाइलवर गेम खेळत बसतात. टीव्हीवर मॅचेस, बातम्या चालूच राहतात. संवाद साधायला वेळच राहिलेला नसतो. रात्र कधीच झालेली असते. दमले भागलेले सारे उद्या परत धावण्यासाठी झोपी जातात. संध्याकाळ न होताच फक्त दिवस आणि रात्र हे चक्र अव्याहत चालू राहते.
आज थोडी परिस्थिती बदलते आहे. या विषाणूने का होईना माणसे घरात बसली आहेत. सार धावणं निरर्थक होत की काय अशी वेळ आली आहे. परमेश्वराने जणू हा धडा आपल्याला दिला आहे काहीही न बोलता. यातून शहाणे होणार का आपण? एक संध्याकाळ शांतपणे घरात बसून अनुभवून घेऊ म्हणजे मिळेल याचे उत्तर. देवापाशी लावलेला दिवा आयुष्य उजळवून टाकेल आणि शुभंकरोती म्हणत डोळे आपोआप मिटले जातील. परमेश्वर सारं शुभच करेल… फक्त आपण थोडं बदलून बघू या…
आरती मोने